गणेशोत्सव श्रद्धेचा की कॉर्पोरेट स्पर्धेचा? लालबागचा राजा मंडळावर संदीप देशपांडेंचा हल्लाबोल मराठी सण उद्योगपतींच्या प्रभावाखाली जाऊ देऊ नका’  ..

4 Min Read

हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | मुंबई – मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवावर वाढत चाललेल्या कॉर्पोरेट प्रभावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या मातीतील आणि मराठी माणसाच्या श्रद्धेशी जोडलेला सण आहे; त्याचे रूपांतर कॉर्पोरेट स्पर्धेत होणे दुर्दैवी आहे,”अशी भूमिका त्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत मांडली.यावेळी देशपांडे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह मुंबईतील काही प्रमुख गणेश मंडळांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.मोठ्या उद्योगसमूहांचा वाढता सहभाग, प्रायोजकत्व आणि मंडळांच्या निर्णयप्रक्रियेतील व्यावसायिक प्रभाव यामुळे गणेशोत्सवाचे मूळ सामाजिक व सांस्कृतिक स्वरूप बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

गणपतीत गरबा खेळायचाच बाकी आहे

गणेशोत्सव हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत देशपांडे यांनी सवाल केला की, मराठी माणसाचे सण गुजराती कंपन्या आणि मोठ्या उद्योगपतींच्या प्रभावाखाली जाणार असतील, तर भविष्यात गणेशोत्सवामध्ये गरबा सुरू होणेच बाकी राहील का?  गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी आर्थिक मदत आवश्यक असली, तरी त्यासाठी मोठ्या उद्योगपतींवर इतक्या प्रमाणात अवलंबून राहण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असताना कॉर्पोरेट कंपन्यांना विशेष महत्त्व का दिले जाते, याचे उत्तर संबंधित मंडळांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

अनंत अंबानींच्या सल्लागारपदावर प्रश्न

लालबागचा राजा मंडळातील अनंत अंबानी यांच्या सल्लागारपदाचा उल्लेख करत देशपांडे यांनी मंडळाच्या निर्णयावर टीका केली. अनेक दशकांपासून गणेशोत्सवाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या मंडळाला अचानक उद्योगपतींच्या सल्ल्याची आवश्यकता का भासली, असा त्यांचा सवाल आहे.गणेशोत्सव मंडळाला एखाद्या कंपनीप्रमाणे चालवायचे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत, एका मोठ्या उद्योगसमूहानंतर दुसरे उद्योगसमूहही या स्पर्धेमध्ये उतरले तर मुंबईतील नामांकित गणेश मंडळे कॉर्पोरेट वर्चस्वाचे केंद्र बनतील, अशी भीती देशपांडे यांनी व्यक्त केली.

देव आणि श्रद्धेचा मार्केटिंगसाठी वापर नको

गणपती उत्सवाचा उपयोग कंपन्यांच्या जाहिराती आणि ब्रँडिंगसाठी केला जात आहे का, असा गंभीर सवालही त्यांनी उपस्थित केला. श्रद्धेच्या व्यासपीठाचे व्यावसायिक मार्केटिंगच्या केंद्रात रूपांतर होता कामा नये, असे मत त्यांनी मांडले.मोठे उद्योगसमूह कोणताही निर्णय आर्थिक फायदा आणि व्यावसायिक हित लक्षात घेऊनच घेतात, असा दावा करत गणेश मंडळांनी त्यांच्या सहभागामागील उद्देश समजून घेणे आवश्यक असल्याचे देशपांडे म्हणाले.

सुधीर साळवींवर थेट टीका – देशपांडे यांनी लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या भूमिकेवरही स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. साळवी आपले चांगले मित्र असले तरी या विषयामध्ये त्यांनी घेतलेली भूमिका चुकीची असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. भविष्यात या मंडळांची ओळख भाविकांच्या श्रद्धेपेक्षा उद्योगपतींच्या नावाने होऊ लागली, तर इतिहास संबंधितांना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्व गणेश मंडळांना आत्मपरीक्षणाचे आवाहन

मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या कंपन्यांचे प्रायोजकत्व स्वीकारताना आपली सांस्कृतिक ओळख, सामाजिक बांधिलकी आणि उत्सवाची परंपरा यांचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले.गणेशोत्सवाचे व्यवस्थापन आधुनिक आणि भव्य असावे; मात्र त्यासाठी उत्सवाची मराठी ओळख, भाविकांची श्रद्धा आणि सामाजिक उद्देश यांच्याशी तडजोड होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती.

मंडळाच्या अधिकृत भूमिकेकडे लक्ष

संदीप देशपांडे यांनी केलेली वक्तव्ये आणि आरोप हे त्यांचे वैयक्तिक तसेच राजकीय मत आहे. या आरोपांवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसल्याने मंडळ काय उत्तर देते, याकडे भाविकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

—  हिंदजागर टीम, मुंबई.

 

TAGGED:
Share This Article
Follow:
Welcome to Hindjagar News — हिंदजागर आणि आसपासच्या परिसरातील ताज्या बातम्या, अद्यतने आणि घडामोडींसाठी तुमचे विश्वसनीय माध्यम. आमचे ध्येय वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अचूक, वेळेवर आणि सहज समजण्याजोग्या बातम्या पुरवणे हे आहे. आम्ही स्थानिक कार्यक्रम, समुदायविषयक घडामोडी, शिक्षण, व्यवसाय, सरकारी कामकाज, सामाजिक मुद्दे, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करतो.
Leave a Comment